नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीन आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अॅप्स वर बंदी घातली होती. यानंतर पुन्हा 47 अॅप्स बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या 47 अॅप्सची यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे.
इंडिया टूडे या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता 250 हून अधिक चिनी अॅप्सची तपासणी करत आहे. यात ग्राहकांच्या सुरक्षेचा किंवा माहितीचे उल्लंघन तर होत नाही ना, याची पाहणी केली जाणार आहे. मुख्य म्हणजे भारताने तयार केलेल्या यादीमध्ये अलिबाबा (Alibaba), पब्जी (PUBG), टेन्सेंट (Tencent), शाओमी (Xiaomi) सारख्या प्रसिद्ध अॅप्सचाही समावेश आहे. असे सुत्रांचे म्हणणे आहे.
भारताने यापुर्वी चीनच्या 59 अॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये टिकटॉक, यूसी आणि हेलोसारखे अनेक अॅप आहेत. चीनी वस्तू, अॅपवर बहिष्कार घालण्यासाठी भारत अमेरिकेसारख्या सबबी शोधत असल्याचे चीन मीडियाने म्हटले आहे. चीनने तयार केलेल्या अॅप्सच्या माध्यमातून चीन अॅड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरुन अॅप्सचा गैरवापर करत आहे. हे अॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापरकर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते.
या व्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालयांनीही अशा धोकादायक अॅप्सवर तातडीने बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.