मुंबई । राज्यातील विरोधी पक्ष शिवसेनेला नेहमी धारेवर धरतांना पाहायला मिळत आहे. ताज हॉटेलला तब्बल 9 कोटी रुपये दंड माफ करणाऱ्या महापालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. त्यामुळे आता भाजपने सत्ताधारी असलेल्या शिवेसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेवर ह्ल्लाबोल केला आहे. शेलार यांनी ट्विट करत सांगितले आहे की, 'ही तर टाटा, बिर्लांची सेना आहे,' असा खोचक टोला भाजपने शिवसेनेवर लगावला आहे.
6/11 दहशतवादी हल्ल्यानंतर ताज आणि नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी बंद केले होते. गेल्या काही वर्षांत ताज हॉटेलनं बंद केलेल्या पदपथांवर झाडाच्या कुंड्या, तसंच अन्य साहित्य ठेवून अतिक्रमण केलं. त्यामुळं महापालिकेनं हॉटेलला 8 कोटी 85 लाख रुपये दंड ठोठावला होता. यापैकी 'ताज'नं 66 लाख रुपये भरले आहेत. मात्र, आता महापालिकेनं दंडमाफी करत या वादावर पडदा टाकला आहे.
मुंबई स्टॉक एक्स्चेंजलाही दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बीएसईला दरमहा भाड्यापोटी दोन लाख 12 हजार याप्रमाणे चार कोटी रुपये दंड, तसेच 15 टक्के व्याजापोटी 60 लाखांहून अधिक रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. नंतर हिशेबात गोंधळ झाल्याचे स्पष्ट करून, दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला.

टाटांच्या हाँटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने "बीएसई" वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 4, 2021
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला...
तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???...
वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!